Monday, January 6, 2020

ऑस्ट्रेलियातील अग्नितांडव

ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये सप्टेंबर २०१९ पासून सतत वणवा पेटत आहे. यामध्ये आतापर्यंत ५० कोटी प्राण्यांचा बळी गेला आहे. १२०० घरे भस्मसात झाली असून २३ लोकांचा मृत्यू झाला आहे. आगीचे लोळ जमीनीपासून २०० फूट वर जात आहे. निळे आकाश तांबड्या रंगाचे झाले आहे. कोरडी हवा, दीर्घकाळापासून असलेला दुष्काळ आणि वाढलेले वारे यांमुळे हे वणवे लागत आहेत.




ऑस्ट्रेलिया हा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात असून त्याच्या मध्यातून मकरवृत्त (Tropic of capricorn) जाते.
२१ सप्टेंबरला सूर्य विषुववृत्तावर (equator) असतो. तेथून त्याचा दक्षिणेकडे प्रवास चालू होऊन २२ डिसेंबरला तो मकरवृत्तावर जातो. यावेळी ऑस्ट्रेलियात उन्हाळा असल्याने तीव्र सूर्यकिरण पडतात. सध्या सूर्य धनु राशीत आहे. बर्‍याच काळापसून गुरु, शनि, केतू हे मोठे ग्रह धनु या अग्नितत्त्वाच्या राशीत आहेत. नुकतेच २६ डिसेंबरला धनु राशीत मूळ या तीक्ष्ण नक्षत्रात सूर्यग्रहण झाले. पाश्‍चात्य ज्योतिषी टॉलेमी याने ऑस्ट्रेलियाची धनु रास मानली आहे. अग्नितत्त्वाच्या प्रकोपामुळे ऑस्ट्रेलियावर भयंकर संकट कोसळलेे. हर्षल मेष राशीत वक्री आहे. ग्रह वक्री असतांना पृथ्वीच्या जवळ असतो. सप्टेंबर २०२० पासून मंगळ हा सिंह, कन्या, तूळ या राशींमधून भ्रमण करून आता वृश्‍चिक राशीत आला आहे. धनु राशीकडून सिंह, कन्या, तूळ या राशी नवम, दशम, एकादश या स्थानांत म्हणजे दक्षिण प्रभागात येतात. दक्षिणेत मंगळ बलवान असतो. ग्रह आपला प्रभाव कसे दाखवतात, हे यातून लक्षात येते. आवश्यकता आहे, ती फक्त त्यांचे सतत निरिक्षण करून परिणाम आजमवण्याची !

ऑस्ट्रेलियाच्या उदाहरणातून सर्व देशांनी बोध घेणे आवश्यक आहे. निसर्गावर विजय मिळवण्याच्या धुंदीत मानवाने स्वत:साठी खड्डा खोदला आहे. जानेवारी २०२० मध्ये शनि मकर राशीत प्रवेश करणार आहे. भारताची रास मकर असल्याने आगामी काळ भारतासाठी प्रतिकूल आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारताने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे !

Thursday, May 9, 2019

१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या आरंभदिनाचे ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण !

१० मे या दिवशी १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा आरंभदिन असल्याच्या निमित्ताने...

१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या आरंभदिनाचे ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण !


लेखातील ठळक सूत्रे :

  • समाजमनाचा उद्रेक !
  • मंगळ-हर्षल यांची स्फोटक युती !
  • लग्नेश मंगळ बलवान नसल्याने समरात पराजय
  • अष्टम स्थानातील शनीमुळे हानीचे प्रमाण अधिक
  • १८५७ च्या समराला लाभली अद्वितीय कीर्ती !

विषयप्रवेश : हिंदुस्थानने केलेल्या प्रचंड उठावामुळे ज्या ब्रिटिश साम्राज्याचा पाया छिन्नविच्छिन्न झाला, असे १८५७ चे स्वातंत्र्यसमर दिनांक १०मे १८५७ या दिवशी चालू झाले. या समराची ठिणगी प्रथम मेरठ येथे पडली आणि मग तिचे वणव्यात रूपांतर झाले. गुप्त नियोजन हे या समराचे वैशिष्ट्य होते. संपूर्ण राष्ट्र क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे ठाकले, तरी देखील इस्ट इंडिया कंपनी सरकारला याचा मागमूस लागला नाही. संपूर्ण समाजाचा सहभाग, समर्पण आणि संघटन ही या समराची वैशिष्ट्ये होती. श्रीमंत नानासाहेब पेशवे, सेनापती तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई या धुरीणांनी क्रांतीचे नेतृत्व केले. इस्ट इंडिया कंपनी सरकारचा भारतावरील अंमल नष्ट करणे, हा या समरामागील हेतू होता. गाय आणि डुकराची चरबी असलेले काडतूस, शेतकर्‍यांवर नगदी पीके घेण्याची सक्ती इत्यादी कारणे ही केवळ निमित्तमात्र होती. इंग्रजांनी तेव्हा ही क्रांती दडपण्याचा प्रयत्न केला; परंतु स्वातंत्र्यप्राप्तीचा अग्नि जो या समरामुळे प्रदीप्त झाला, तो पुढे ९० वर्षे धगधगत राहिला ! प्रस्तुत लेखात दिनांक १० मे १८५७ या दिवशीच्या चंद्रकुंडलीचे ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण केलेे आहे.


समाजमनाचा उद्रेक !
प्रथम स्थानावरून जनतेचा विचार होतो. १० मे १८५७ या दिवशी चंद्र वृश्‍चिक राशीत होता. वृश्‍चिक रास जलतत्त्वाची आणि तिचा स्वामी मंगळ अग्नितत्त्वाचा असल्याने ही रास भावनाशील असूनही लढवय्या वृत्तीची आहे. प्रथम स्थानातील वृश्‍चिकेचा चंद्र जनतेच्या मनातील भावनांचा उद्रेक, सूडाग्नी दर्शवतो.

मंगळ-हर्षल यांची स्फोटक युती !

सप्तम स्थान हे युद्ध, क्रांती यांचे स्थान आहे. लग्नेश मंगळ सप्तम स्थानात हर्षलच्या युतीत आहे. हा योग स्फोटक असून युद्ध, क्रांती दर्शवतो.

लग्नेश मंगळ बलवान नसल्याने समरात पराजय

सप्तम स्थानात असणारी बुध-मंगळ युती वृश्‍चिक लग्नासाठी अशुभ आहे. मंगळाचा शत्रू असणारा बुध हा अष्टमेश असल्याने १८५७ च्या समरात फितुरांनी इस्ट इंडिया कंपनीला साथ दिली, त्यामुळे देशाची हानी झाली. लग्नेश मंगळ बलवान नसणे, मंगळावर शुभ ग्रहाची दृष्टी नसणे यांमुळे समरात पराजय पदरी पडला.

अष्टम स्थानातील शनीमुळे हानीचे प्रमाण अधिक

चतुर्थ स्थानावरून दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती इत्यादींचा विचार केला जातो. कुंडलीत चतुर्थेश शनि अष्टम या मृत्यु स्थानात असल्यामुळे समराच्या दरम्यान आणि त्यानंतर पडलेल्या दुष्काळात ८ लक्षहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. - (संदर्भ : विकीपिडिया) वृश्‍चिक लग्नाला अशुभ असणारा शनि अष्टम स्थानात असल्याने समरात हानी अधिक प्रमाणात झाली, तसेच युद्ध बराच काळ चालू राहिले.

१८५७ च्या समराला लाभली अद्वितीय कीर्ती !

प्रथम स्थानातील चंद्र भाग्य स्थानाचा स्वामी आहे. भाग्य स्थान कीर्तीदायक असते. त्यामुळे या समराची अद्वितीय कीर्ती झाली. या समरातून पुढे अनेक क्रांतीकारकांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढा दिला.


१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील ज्ञात-अज्ञात वीरांना शतश: नमन !

देशाला सुराज्य मिळवून देणे, हे आता आपले दायित्व आहे !


॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद
संपर्क क्र. ९४२३१८५२५६
ई-मेल : raj9karve@gmail.com

Wednesday, January 2, 2019

स्वामी स्वरूपानंद, पावस


स्वामी स्वरूपानंद, पावस


आज मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशीस (२.१.२०१९ या दिवशी) स्वामी स्वरूपानंद (पावस) यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचा जीवनप्रवास आणि त्यासंबंधी ग्रहयोग यांचा या लेखात विचार केला आहे. स्वामी स्वरूपानंद यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

स्वामी स्वरूपानंद, पावस


लेखातील ठळक सूत्रे :
  • सात्त्विक वातावरण असलेल्या घराण्यात जन्म
  • स्वावलंबित्व, नेतृत्वगुण, स्वातंत्र्यप्रेम आदी गुणवैैशिष्ट्ये
  • स्वावलंबाश्रमाची स्थापना
  • सद्गुरूंची प्रथम भेट
  • उत्कट गुरुभक्ती
  • कारावासातही साधना
  • कालौघात देहास आजार
  • साक्षात् श्रीमहाविष्णुचे सगुण दर्शन !
  • महासमाधी
  • अंत:स्फूर्तीतून सिद्ध झाले अलौकिक ग्रंथ !




सात्त्विक वातावरण असलेल्या घराण्यात जन्म

पावस, रत्नागिरी येथे श्री. विष्णुपंत गोडबोले आणि सौ. रखमाबाई गोडबोले हे दांपत्य रहात. श्री. विष्णुपंत श्रीविष्णुंचे भक्त होते. ते सदैव विष्णूसहस्रनामाचा पाठ करत. अशा सात्त्विक वातावरण असलेल्या घराण्यात स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी या तिथीस (१५.१२.१९०३) झाला. कुंडलीतील द्वितीय स्थान घराण्याचे कारक स्थान आहे. त्याचा स्वामी चंद्र ग्रह पंचम या कोणस्थानात (शुभस्थानात) आहे. तसेच चंद्र ग्रह विशाखा या गुरु ग्रहाच्या नक्षत्रात असून गुरु ग्रह नवम (भाग्य) स्थानात आहे. चंद्र आणि गुरु यांचा नवपंचमयोग (शुभयोग) आहे. हे योग घराण्यात सात्त्विक वातावरण, सदाचरण अन् उपासना दर्शवतात. चंद्र ग्रह गुरु ग्रहाच्या नक्षत्रात असल्यामुळे जन्मत: गुरु ग्रहाची महादशा होती. त्यामुळे बालपणापासूनच त्यांना गीतेविषयी जिज्ञासा होती. बाल्यापासुनि गीताध्ययनीं होता मज बहु छंद असे त्यांनीच म्हटले आहे.

स्वावलंबाश्रमाची स्थापना

स्वामीजींनी लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांचा आदर्श घेऊन राष्ट्रोद्धारासाठी तरुणांना स्वावलंबनाचेशिक्षण देणेे, या ध्यासाने वयाच्या २० व्या वर्षी पावस येथे स्वावलंबाश्रमाची स्थापना केली. लग्न स्थानाचा स्वामी बुध ग्रह धनु राशीत आणि मूळ नक्षत्रात असल्याने स्वावलंबित्व, नेतृत्वगुण, स्वातंत्र्यप्रेम अशीगुणवैशिष्ट्ये दर्शवतो. पुढे काही विद्यार्थ्यांसोबत पुण्याला जाऊन स्वामीजींनी विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि स्वत:चे वाङ्मय विशारदचे शिक्षण आरंभ केले. नवम स्थानातील गुरु ग्रह वाङ्मय विशारदच्या शिक्षणास अनुकूल आहे.

सद्गुरूंची प्रथम भेट

इसवी सन् १९२३ मध्ये स्वामीजींचे मामा श्री. केशवराव गोखले यांच्यामुळे पुण्यास सद्गुरु श्री. गणेशनाथ उपाख्य बाबामहाराज वैद्य यांच्या भेटीचा योग आला. श्री. बाबामहाराज हे श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या नाथ परंपरेतील एक थोर साक्षात्कारी सत्पुरुष होते. स्वामीजींना त्यांचा अनुग्रह लाभला आणि स्वामीजींच्या आध्यात्मिक जीवनास सुरुवात झाली. त्यावेळी शनि महादशेअंतर्गत बुध ग्रहाची अंतर्दशा चालू होती. शनि ग्रह भाग्य स्थानाचा आणि बुध ग्रह लग्न स्थानाचा स्वामी आहे. दोन्ही ग्रह अध्यात्मास पूरक आहेत.

उत्कट गुरुभक्ती

स्वामीजींचे सद्गुरु श्रीज्ञानेश्‍वरीची हस्तलिखित प्रत प्रतिदिन वाचत. ती प्रत जीर्ण झालेली पाहून स्वामीजींनी चार मासांच्या (महिन्यांच्या) कालावधीत स्वताच्या हस्ताक्षरात श्रीज्ञानेश्‍वरी लिहून ती सद्गुरूंना अर्पण केली. या प्रसंगातूनत्यांच्या गुरुभक्तीचा प्रत्यय येतो. गुरुभक्ती म्हणजे शिष्याच्या मनात गुरूंप्रती असणारा भाव ! कुंडलीत चंद्र ग्रह स्वराशीतील शुक्र ग्रहाच्या युतीत आहे. शुक्र ग्रह जलतत्त्वाचा कारक असल्याने प्रेम त्याच्या आधिपत्याखाली येते. शुक्र आणि चंद्र या ग्रहांवर गुरु ग्रहाची नवम स्थानातून दृष्टी असल्याने हे प्रेम प्रत्यक्ष गुरुमाऊलींप्रती होते ! शुक्र-चंद्र-गुरु या ग्रहांचे परस्परांतील योग उच्च कोटीची गुरुभक्ती दर्शवतात. तिन्ही ग्रह कोणस्थानांमध्ये असल्याने शुभ आणि बलवान आहेत.

कारावासातही साधना

मिठाच्या सत्याग्रहासाठी कोकणात दौरे काढल्याने आणि स्वत: सत्याग्रह केल्याने त्यांना अटक करून येरवडा कारागृहात बंदिस्त केले गेले. सतत ईश्‍वराच्या अनुसंधानात असणार्‍या स्वामीजींसाठी ही जणू सुवर्णसंधी होती.तिचा लाभ घेऊन एकांतवासात स्वामीजींनी ध्यानाची साधना केली. कारागृहात असतांना त्यांनी  नवरत्नहार या काव्याची रचना केली. कारागृहातून मुक्तता झाल्यावर ते काव्य त्यांनी गुरुचरणी अर्पण केले. तेव्हा बाबामहारजांना अतिशय आनंद झाला. त्यांनी स्वामीजींच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून स्वामी स्वरूपानंद असे त्यांचे नामकरण केले. कारावासचा विचार व्यय स्थानावरून केला जातो. व्यय स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह राहू ग्रहाच्या नक्षत्रात आहे. राहू ग्रह व्यय स्थानाचा कार्येश झाल्यामुळे तसा प्रसंग आला; परंतु व्ययेश शुक्र ग्रह पंचम या उपासनेच्या कारक स्थानात असल्याने कारागृहात त्यांनी साधना केली आणि गुरूंना प्रसन्न करून घेतले.

कालौघात देहास आजार

स्वामीजी पावस येथे परतल्यावर त्यांना मलेरिया झाला. पुढे सन् १९३४ मध्ये स्वामीजी श्री. देसाई यांच्याकडे काही दिवस हवापालट म्हणून रहावयास गेले. त्यांना पुष्कळ अशक्तपणा असल्याने, तसेच स्वामीजींच्या वृद्ध मातोश्रींना स्वामींजींची सर्व व्यवस्था लावणे उतारवयामुळे कठिण असल्याने श्री. देसाई यांंच्याकडेच पुढील ४० वर्षे स्वामीजी वास्तव्यास राहिले. श्री. देसाई यांनी स्वामीजींची मनोभावे सेवा केली. षष्ठ स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह अष्टम स्थानात अष्टमेश शनि ग्रहासोबत आहे. हा योग आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. अशक्तपणा, थकवा, सतत काही ना काही आजारपण दर्शवतो.

साक्षात् श्रीमहाविष्णुचे सगुण दर्शन !

निर्गुण साक्षात्कारानंतर स्वामीजींना भगवान श्रीविष्णुच्या सगुण रूपाचे दर्शन घेण्याची तीव्र तळमळ लागली. सन् १९४२ या वर्षी रहात्या खोलीत स्वामीजींना श्रीमहाविष्णुचे प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यावेळी लग्नेश बुध ग्रहाची महादशा होती आणि पंचमेश शुक्र ग्रहाची अंतर्दशा होती.

महासमाधी

१५.८.१९७४ या दिवशी स्वामीजींनी महासमाधी घेतली. त्या वेळी व्ययेश शुक्र ग्रहाची महादशा होती. याच दिवशी गुरु ग्रहाची अंतर्दशा संपली होती. गोचरीचा अष्टमेश शनि ग्रह लग्न स्थानी होता. आत्माकारक रवि ग्रह आणि लग्न स्थानाचा स्वामी बुध यांची युती होती. गोचरीचा रवि ग्रह मूळ कुंडलीतील अष्टमेश शनि ग्रहाच्या प्रतियोगत होता.

अंत:स्फूर्तीतून सिद्ध झाले अलौकिक ग्रंथ !

स्वामीजींनी अभंग ज्ञानेश्‍वरी, श्री भावार्थगीता, श्री अभंग अमृतानुभव, संजीवनी गाथा इत्यादी प्रासादिक ग्रंथांची रचना केली. पंचम स्थानातील चंद्र-शुक्र या ग्रहांची युती कवित्वशक्ती, प्रतिभा दर्शवते. चंद्र-शुक्र या ग्रहांचा गुरु अन् नेपच्यून या ग्रहांशी धर्मत्रिकोणात नवपंचमयोग असल्याने अंत:स्फूर्ती होऊन त्यांनी अलौकिक असे पद्यरूपातील आध्यात्मिक ग्रंथांची निर्मिती केली. तृतीय स्थानाचा स्वामी रवि भावचलित कुंडलीनुसार सप्तम स्थानात असल्याने लेखनामुळे कीर्ति लाभली. दशम स्थानाचा स्वामी गुरु ग्रह भाग्य स्थानी असणे, दशम स्थानात मीन राशीतील केतू ग्रह असणे, दशम स्थानावर शनि ग्रहाची दृष्टी असणे यांमुळे आध्यात्मिक ग्रंथरचना, शिष्यांना साधनेविषयी मार्गदर्शन इत्यादी आध्यात्मिक कार्य हेच स्वामींजींचे कर्म झाले.
व्यय स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह पंचम स्थानात असून त्यावर शनि अन् गुरु या ग्रहांची दृष्टी असल्यानेेे, तसेच कुंडलीतील इतर आध्यात्मिक योगांमुळे शाश्‍वत असणारी मोक्षप्राप्ती झाली (नित्य आनंदावस्था लाभली).

(जीवनप्रवासाच्या माहितीचा संदर्भ : swamiswaroopanandpawas.in)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद
संपर्क क्र. ९४२३१८५२५६
ई-मेल : raj9karve@gmail.com

Sunday, December 30, 2018

इंडोनेशियाची त्सुनामी... (भाग १)


इंडोनेशियाची त्सुनामी...
(भाग १)


विषयप्रवेश : २२.१२.२०१८, शनिवार या दिवशी रात्री ९.३० या स्थानिक वेळेच्या सुमारास इंडोनेशियाधील सुंडा स्ट्रेट येथे ज्वालामुखीचा उद्रेक होऊन भूस्खलन झाल्यामुळे सुमात्रा आणि जावा या बेटांच्या किनारपट्ट्यांवर त्सुनामी आली. त्यामध्ये ४२६ नागरिकांचा मृत्यू झाला. जवळपास १५०० नागरिक जखमी झाले. या घटनेचा मेदिनीय ज्योतिष शास्त्राच्या आधारे आढावा घेऊया. प्रथम आपण भूकंप, त्सुनामी आणि ज्वालामुखी या नैसर्गिक आपत्तींची कारणे, त्यांचे कारक ग्रह, कुंडलीतील कारक स्थाने इत्यादी घटकांचा विचार करूया.

भूकंप, त्सुनामी आणि ज्वालामुखी यांची कारणे आणि संबंधित कारक ग्रह

भूपृष्ठावर मुळातच ज्या भेगा आहेत, अशा भेगांखाली असणारे खडकांचे थर जेव्हा एकमेकांवर घसरतात, तेव्हा भूगर्भात अकस्मात हालचाली होतात. भूगर्भात होणार्‍या हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्यामुळे भूकंप लहरी निर्माण होतात. या भूकंप लहरींमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग थरथरतो. याला आपण भूकंप म्हणतो. (संदर्भ : विकिपीडिया)
भूगर्भातील हालचाली शनि ग्रहाशी संबंधित आहेत. शनि ग्रह वायुतत्त्वाचा कारक असून गती ही वायुतत्त्वाची क्रिया आहे. घर्षणक्रियेत गती असल्याने घर्षणातून अग्नि तयार होते. उदा. तळहातावर तळहात चोळल्यावर त्यांच्यात उष्णता निर्माण होते. मंगळ ग्रह अग्नितत्त्वाचा कारक आहे म्हणजेच भूगर्भात होणार्‍या हालचालींमुळे उत्सर्जित होणार्‍या उर्जेचा नैसर्गिक कारक मंगळ ग्रह आहे. त्यामुळे भूकंपाचा विचार करतांना शनि आणि मंगळ या ग्रहांचा विचार प्रामुख्याने होतो.
भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून जितका निकट असतो, तितकी हानी अधिक होते. हाच केंद्रबिंदू समुद्राच्या तळाशी असता त्सुनामी लाटा निर्माण होतात. समुद्राच्या तळाशी भूकंप झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे विस्थापन होऊन पाण्याचा असमतोल निर्माण होतो. त्सुनामी लाटा समुद्रात दूरवर असतात, तेव्हा त्यांची लांबी शेकडो किलोमीटर असते अन् उंची अल्प असतेे; त्यामुळे त्या सहज लक्षात येत नाहीत. मात्र जशा त्या लाटा किनार्‍यालगतच्या उथळ भूपृष्ठावर येतात, तसा त्यांचा वेग अल्प होऊन उंची वाढत जाते. त्यामुळे पाण्याची जणू मोठी भिंत तयार होते. अशी एक लाट मोठा परिसर उद्ध्वस्त करण्यास पुरेशी असते. (संदर्भ : विकिपीडिया)
ज्वालामुखीमुळेसुद्धा भूकंप किंवा त्सुनामी निर्माण होऊ शकतात. पृथ्वीचे कवच १७ मोठ्या, कठीण टेक्टॉनिक प्लेट्स मध्ये विभागलेले आहे. या प्लेट्स उष्ण, मऊ आवरणावर तंरगत असतात. या प्लेट्स जेव्हा एकमेकांपासून भिन्न होतात किंवा एकत्र येतात, तेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन लावा, राख इत्यादी गोष्टी बाहेर फेकल्या जातात. (संदर्भ : विकिपीडिया)
येथेसुद्धा टेक्टॉनिक प्लेट्सचे चलत्व शनि ग्रहाच्या कारकत्वाखाली आहे; तर लावा, उष्णता हे मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी यांचे मुख्य कारक शनि आणि मंगळ हे ग्रह आहेत. भूकंप आणि ज्वालामुखी यांचा विचार करतांना पृथ्वीतत्त्वाचा कारक असणारा बुध ग्रह, तसेच त्सुनामीचा विचार करतांना जलतत्त्वाचा कारक असणारा शुक्र ग्रह यांचाही विचार करणे योग्य ठरेल.

नैसर्गिक आपत्तींची कारक स्थाने

१. चतुर्थ स्थान : नैसर्गिक आपत्तींचा मुख्य विचार चतुर्थ स्थानावरून केला जातो. शेती, जमीन, खाण, जलाशय, पर्जन्य, हवामान इत्यादी गोष्टींचे हे कारक स्थान आहे.

२. अष्टम आणि द्वादश स्थान : अष्टम आणि द्वादश ही दोन स्थाने हानी, नुकसान यांचे कारक असल्याने नैसर्गिक आपत्तींना पूरक अशी आहेत.

३. मारक आणि बाधक स्थाने : द्वितीय आणि सप्तम या मारक स्थानांचा, तसेच लग्नराशीनुसार बाधक स्थानाचा विचार करावयास हवा.

कुंडली अभ्यास

इंडोनेशिया हा देश अग्नि वृत्तावर (पॅसिफिक रिंग ऑफ फायर) स्थित आहे. इंडोनेशियामध्ये १२७ सक्रिय ज्वालामुखी आहेत. त्यामुळे तेथे वारंवार भूकंप, त्सुनामी आणि ज्वालामुखी या नैसर्गिक आपत्ती येत असतात. इंडोनेशिया देशाची लग्न कुंडली पुढे मांडली आहे. त्याद्वारे वारंवार नैसर्गिक आपत्ती येणे हा परिणाम दर्शवणारे योग अभ्यासता येतील.


लग्न कुंडलीतील सततचे नैसर्गिक आपत्ती दर्शवणारे योग

चतुर्थ स्थानाचा स्वामी शनि ग्रह नवम् स्थानात असून त्याची राहू ग्रहाशी युती आहे. शनि आणि राहू हे दोन्ही ग्रह तमोगुणी असल्याने त्यांची युती प्रतिकूल आणि बाधक आहे. चतुर्थेश शनि ग्रह राहू ग्रहामुळे दूषित झाल्याने चतुर्थ स्थान प्रतिकूल झाले आहे; परिणामी इंडोनेशियामध्ये सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत असतात आणि तेथील नागरिकांसाठी ही नित्याची बाब झाली आहे.
शनि आणि राहू या ग्रहांसोबत शुक्र ग्र्रहसुद्धा नवम स्थानात आहे. शुक्र ग्रह कुंडलीतील लग्न आणि अष्टम या स्थानांंचा स्वामी असल्याने त्याची स्थिती महत्त्वाची आहे. लग्न हे जनतेचे कारक स्थान आहे, तर अष्टम हे नुकसान, दुर्घटना यांचे कारक स्थान आहे. शुक्र ग्रह शनि, राहू या ग्रहांच्या युतीमध्ये असल्याने तेथील जनतेला नेहमी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो, तसेच पुष्कळ नुकसान होते. शनि-राहू-शुक्र या ग्रहांची युती बाधक असून नैसर्गिक आपत्ती दर्शवते.
मंगळ ग्रह अष्टम स्थानात आहे. मंगळ ग्रह द्वितीय आणि सप्तम या स्थानांचा स्वामी आहे. तो अष्टम स्थानात हर्षल ग्रहाच्या युतीत आहे. हा योग स्फोटक आणि तीव्र परिणाम करणारा आहे. ज्वालामुखी, अग्निकांड, मोठ्या दुर्घटना दर्शवतो. मंगळ आणि हर्षल या ग्रहांचा द्वितीय स्थानातील चंद्र ग्रहाशी प्रतियोग असल्याने स्फोटक परिणामाची तीव्रता अधिक वाढली आहे.
द्वादश (व्यय) स्थानाचा स्वामी बुध ग्रह वक्री आणि अस्तंगत स्थितीत आहे. त्यामुळे व्यय स्थान अधिक प्रतिकूल आहे. बुध ग्रह एकादश स्थानात आहे. तूळ लग्नकुंडलीसाठी एकादश स्थान बाधक असते. रवि एकादश स्थानाचा स्वामी असल्याने बाधकेश आहे. बुध ग्रह रवि ग्रहाच्या म्हणजे बाधकेश ग्रहाच्या युतीत असल्याने पुष्कळ हानी दर्शवतो.

२२.१२.२०१८ या दिवशीच्या गोचर कुंडलीत (तात्कालिक कुंडलीत) असलेले योग

२२.१२.२०१८ या दिवशीची गोचर कुंडली पुढे दिली आहे. त्यातील ग्रहांचे इंडोनेशियाच्या लग्न कुंडलीतील ग्रहांशी कसे योग आहेत, याचे विश्‍लेषण पुढे दिले आहे.


विश्‍लेषण

चतुर्थ स्थानाचा स्वामी शनि ग्रह तृतीय स्थानात आहे. शनि ग्रहाचा मूळ कुंडलीतील (लग्न कुंडलीतील) राहू आणि शुक्र (अष्टमेश) या ग्रहांशी प्रतियोग झाला आहे. त्यामुळे चतुर्थेश शनि ग्रह दूषित झाला आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीला पूरक असे वातावरण निर्माण झाले.
कुंडलीतील मारक स्थानांचा स्वामी मंगळ ग्रह पंचम स्थानात आहे. त्याचा मूळ कुंडलीतील मंगळ आणि हर्षल या ग्रहांशी केंद्रयोग (अशुभयोग) आहे. हा केंद्रयोग स्फोटक परिणाम दर्शवतो. मंगळ ग्रहाची अष्टम, एकादश (लाभ) आणि द्वादश (व्यय) या स्थानांवर दृष्टी आहे. मंगळ ग्रहाच्या दृष्टीमुळे अष्टम आणि द्वादश या हानीकारक स्थानांची अशुभता आणखी वाढली, तर एकादश या लाभदायी स्थानाची शुभता अल्प झाली. 
यांतील निर्णायक स्थिती रवि ग्रहाची आहे. रवि एकादश स्थानाचा स्वामी असल्याने बाधकेश आहे. बाधकेश रवि ग्रह गोचरीने तृतीय स्थानात आहे. त्याची चतुर्थेश शनि ग्रहाशी युती असून ही युती आपत्तीदर्शक आहे. या दिवशी पौर्णिमा होती; म्हणजे रवि आणि चंद्र हे ग्रह समोरासमोर (प्रतियोगात) होते. गोचरीचा रवि ग्रह मूळ कुंडलीतील राहू ग्रहाच्या प्रतियोगात आहे. त्याच वेळी गोचरीचा चंद्र ग्रह मूळ कुंडलीतील राहू ग्रहाच्या युतीत आहे. याला सूक्ष्म चंद्रग्रहण म्हणता येईल. हा महत्त्वाचा कुयोग आहे. अशा योगावर रवि आणि चंद्र हे ग्रह दूषित होतात आणि अनिष्ट घटना घडतात.

पौर्णिमेच्या दिवशी त्सुनामी !

२२.१२.२०१८ या दिवशी पौर्णिमा होती. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राकडून समुद्राचे पाणी स्वत:कडे खेचण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच या दिवशी चंद्राची भ्रमणगतीसुद्धा अधिक होती. एरव्ही चंद्र २४ तासांत सरासरी १२ अंश अंतर आक्रमतो; त्सुनामीच्या दिवशी चंद्राची भ्रमणगती १४ ते १५ अंश इतकी जलद होती ! या दिवशी मंगळ ग्रहाचे मृग नक्षत्र होते. मंगळ ग्रह मारक स्थानांचा स्वामी आहे. वार शनिवार होता. मागे सांगितल्याप्रमाणे शनि ग्रहाची मूळ कुंडलीतील तसेच गोचर कुंडलीतील स्थिती अशुभ आहे. दिनांक २२ होता. २२ अंकाची बेरीज ४ येते. ४ या अंकावर हर्षल ग्रहाचे स्वामित्व आहे. २२.१२.२०१८ या दिनांकाची बेरीज ९ येते (२+२+१+२+०+१+८ = १८ = १+८ = ९). ९ या अंकावर मंगळ ग्रहाचे स्वामित्व आहे. यावरून असे लक्षात येते की, कुंडलीतील प्रतिकूल ग्रहांचे नक्षत्र, वार, दिनांक इत्यादी असतांना त्सुनामी लाट आली.

एकच ग्रहस्थिती; पण परिणाम वेगळे ?

काही वाचकांना वाटू शकते की, पूर्ण जगासाठी गोचर (वर्तमान) ग्रहस्थिती एकच असतांना इंडोनेशियातच त्सुनामी का आली ? याचे कारण असे की, प्रत्येक देशाच्या मूळ कुंडलीतील ग्रहस्थिती निराळी असल्याने वर्तमान ग्रहस्थितीचा परिणाम प्रत्येक देशासाठी निराळा असतो. जसे प्रत्येक मनुष्यासाठी एकच वर्तमान ग्रहस्थिती वेगवेगळा परिणाम करते, तसेच हे आहे.

काळाचा संबंध शोधूया !

२६.१२.२००४ या दिवशी इंडोनशियामध्ये प्रचंड मोठी त्सुनामी आली होती. एकट्या इंडोनशियात लक्षावधी लोक मरण पावले होते. त्या दिवशीसुद्धा पौर्णिमा, मृग नक्षत्र, शनिवार होता. अर्थात दोन त्सुनामी विशिष्ट काळात येण्यात काळाचा काहीतरी संबंध निश्‍चित असावयास हवा. ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाद्वारे हा संबंध शोधता येऊ शकतो !

इंडोनेशियात यापूर्वी आलेले मोठे आणि मध्यम नैसर्गिक आपत्ती यांचा थोडक्यात आढावा भाग २ या लेखात घेऊया. नैसर्गिक आपत्तींच्या संदर्भात भाकिते करण्यास विज्ञानाची असमर्थता आणि ज्योतिषशास्त्राची समथर्र्ता यांचीही पुढील भागात चर्चा करूया. नमस्कार !

(नम्र विनंती : ज्योतिषतज्ञांना या लेखात काही सुधारणा सुचवायच्या असल्यास, त्यांनी त्या आवश्य कळवाव्यात.)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद
संपर्क क्र. ९४२३१८५२५६
ई-मेल : raj9karve@gmail.com

Tuesday, December 25, 2018

शेतकर्‍यांची कर्जमाफी...



शेतकर्‍यांची कर्जमाफी...

(मेदिनीय ज्योतिषशास्त्राच्या आधारे केलेले विश्‍लेषण)




विषयप्रवेश : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तिसगड, तेलंगण आणि मिझोराम या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल ११.१२.२०१८ या दिवशी घोषित झाले. त्यानंतर लगेचच काही दिवसांमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगड या राज्यांमध्ये शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्याचे घोषित झाले. तसेच गुजरात आणि आसाम या राज्यांमध्येही शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली गेली. यामुळे शेतकर्‍यांना तात्पुरता दिलासा मिळाला; मात्र राज्यांच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडला. कर्जमाफी ही कृषीविषयक समस्येवरील उपाय असू शकत नाही, असे नीती आयोगाने स्पष्ट केले. ५ राज्यांमधील कर्जमाफीच्या घोषणा ५ दिवसांत झाल्या. कर्जमाफी हा विषय राज्यांच्या पर्यायाने राष्ट्राच्या संदर्भात असल्याने भारताच्या लग्न कुंडली (स्वातंत्र्यदिनाची कुंडली)आणि गोचर कुंडली (तात्कालिक कुंडली) यांवरून या ५ दिवसांतील ग्रहस्थितीचा आढावा घेऊया. मेदिनीय ज्योतिष पद्धतीत राष्ट्राच्या संदर्भात राष्ट्राच्या कुंडलीवरून अभ्यास केला जातो.

विश्‍लेषण

मेदिनीय ज्योतिषात कुंडलीतील चतुर्थ स्थानावरून शेती, तसेच शेतकर्‍यांचा विचार केला जातो. भारताच्या गोचर कुंडलीत चतुर्थ स्थानाचा स्वामी रवि ग्रह अष्टम स्थानात आहे. अष्टम स्थान हे एकप्रकारचे धनस्थान आहे. अष्टम स्थान अचानक धनलाभाचे कारक स्थान आहे. चतुर्थेश रवि ग्रह अष्टम स्थानात असणे, हा योग शेतकरी वर्गाच्या कर्जमाफीसाठी निर्णायक घटक ठरला. रवि ग्रह १६ डिसेंबर २०१८ पर्यंत गोचर कुंडलीतील सप्तम स्थानात होता; त्यानंतर तो अष्टम स्थानात गेला अन् कर्जमाफीच्या घोषणा सुरू झाल्या. परंतु केवळ रवि ग्रह या परिणामाला कारणीभूत नाही; कारण प्रत्येक वर्षी रवि ग्रह अष्टम स्थानात एक महिना असतो. त्यामुळे प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावयास हवी; पण तसे होत नाही; कारण इतर ग्रहयोग संबंधित घटनेला अनुकूल किंवा प्रतिकूल असतात. येथे अष्टम स्थानात झालेली रवि आणि शनि या ग्रहांची युती महत्त्वाची आहे. शनि ग्रह दशम स्थानाचा स्वामी आहे. दशम स्थान हे सरकार, सत्ताधारी पक्ष यांचे कारक स्थान आहे. त्यामुळे अष्टम स्थानात असणारी रवि आणि शनि या ग्रहांची युती सरकारद्वारे शेतकर्‍यांना कर्जमाफी हा परिणाम दर्शवते. येथे काही जणांना असे वाटेल की, रवि आणि शनि हे ग्रह पुढे जेव्हा अष्टम स्थानात पुन्हा एकत्र येतील, तेव्हा पुन्हा कर्जमाफी होईल, असेे भाकित आपण वर्तवू शकतो का ?, तर येथे पुन्हा नाही असे उत्तर आहे. कारण जरी एखादा ग्रहयोग एखादा परिणाम करण्यास मुख्य भूमिका बजावत असला, तरी त्याला साहाय्यकारक असे इतर ग्रहयोग असतात. इतर ग्रहांचा सहयोग वरील गोचर कुंडलीत कसा झाला, ते पाहूया. ५ राज्यांमधील शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली; म्हणजेच दुसर्‍या शब्दात राष्ट्राने ते कर्ज स्वत:वर घेतले. कुंडलीतील षष्ठ स्थान हे कर्ज घेण्याचे कारक स्थान आहे. गोचर कुंडलीत शुक्र ग्रह षष्ठ स्थानात तूळ राशीत म्हणजे स्वराशीत आहे. षष्ठ स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह बलवान झाल्याने आणि शुक्र्र ग्रह धनाचा कारक ग्रह असल्याने देशाला कर्ज घ्यावे लागले. येथे असा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो की, शुक्र ग्रह नैसर्गिक शुभग्रह असूनही कर्ज घेण्यासारखा प्रसंग कसा आला ? भारताच्या लग्न कुंडलीत षष्ठ स्थानात गुरु ग्रह असून तो अष्टम स्थानाचा स्वामी आहे. या मूळ गुरु ग्रहावरून शुक्र ग्रह गोचर झाल्याने हा परिणाम झाला. मूळ गुरूला अष्टम स्थानाचा स्वामी असल्याचा दोष आहे.

आगामी ग्रहस्थिती आणि तिचा परिणाम

सध्या गोचरीचा शनि ग्रह अष्टम स्थानात आहे. तो एप्रिल २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात वक्री होत आहे आणि पुढील साधारण ५ महिने वक्री रहाणार आहे. एप्रिल महिन्यातच अष्टम स्थानातील गुरु ग्रह वक्री होणार आहे. राहू ग्रह त्यावेळी द्वितीय स्थानात असेल; त्यामुळे शनि आणि राहू या ग्रहांचा प्रतियोग (अशुभयोग) होणार आहे. हे योग द्वितीय आणि अष्टम या स्थानांमध्ये होणार आहेत. द्वितीय स्थान हे देशातील बँका, शेअर मार्केट, सरकारी ताळेबंद इत्यादी आर्थिक गोष्टींशी संबंधित आहे. अष्टम स्थान हे दुर्घटना, मृत्यू, नुकसान इत्यादींचे कारक आहे. एप्रिल २०१९ नंतरचे योग देशाच्या आर्थिक स्थितीसाठी पुष्कळ अशुभ आहेत. द्वितीय स्थानातील राहू ग्रहामुळे सरकारी कारभारात अनियमितता दिसून येण्याची शक्यता आहे. अष्टम स्थानातील दूषित शनि ग्रहामुळे पेट्रोलच्या किमती अणि महागाई वाढू शकते. देशभरात मंदीचे वातावरण राहू शकते. रवि ग्रह मीन राशीत गोचर झाल्यावर (मार्च किंवा एप्रिल २०१९ मध्ये ) पुन्हा कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. मे २०१९ मध्ये मंगळ आणि राहू यांची द्वितीय स्थानात युती होणार असल्याने घोटाळे, बँकांमधील अपहार उघड होण्याची शक्यता आहे. अग्निकांड, हिंसक आंदोलने, अनैतिकता, आतंकवादी कारवाया यांमुळे सर्वप्रकारचे नुकसान संभवते. जातीनिहाय आरक्षणामुळे देशात अस्थिरता निर्माण होऊ शकते. षष्ठेश शुक्र ग्रह जुलै २०१९ मध्ये राहू ग्रहाशी वायुराशीत युती करणार असल्याने साथीचे रोग, विचित्र रोग यांची लागण होण्याची शक्यता आहे.

(नम्र विनंती : वरील लेखात वाचकांना किंवा ज्योतिष तज्ञांना काही सुधारणा वाटत असल्यास त्यांनी आम्हाला आवश्य कळवाव्यात.) (२५.१२.२०१८)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

श्री. राज धनंजय कर्वे, ज्योतिष विशारद
संपर्क क्र. ९४२३१८५२५६
ई-मेल : raj9karve@gmail.com
karvejyotishsanshodhan.blogspot.com

ऑस्ट्रेलियातील अग्नितांडव ऑस्ट्रेलियातील जंगलांमध्ये सप्टेंबर २०१९ पासून सतत वणवा पेटत आहे. यामध्ये आतापर्यंत ५० कोटी प्राण्यांचा बळी गे...